शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

आपल्याला जबाबदारीचे भान असायला हवे.

आपले राष्ट्रीय सण म्हणजेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस असले की, आपण सर्वजण आनंदाने स्टेटस ठेवतो व आपल्या फेसबुक वर फोटो टाकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो. पण हेच म्हणजे आपली खरी देशभक्ती आहे का......? देशभक्ती त्या दिवसा पुरतीच मर्यादित का राहते......? आज भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आहेत पण भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले.आपल्या जीवाचे हसत हसत बलिदान दिले. त्यांच्या स्वप्नातील भारत आज उभा दिसतो का....?
74 वर्षानंतर आज आपल्या देशाची स्थिती पाहिली तर आज ही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रगती पाहिजे तशी झाली नाही असे आपणास पहावयास मिळेल. समाजामध्ये जातीयता तेढ जातीवरून केलेल्या राजकारण पाहायला मिळेल. समाजामध्ये विविध गट पाहायला मिळतील. आजही स्त्री-पुरुषांमध्ये कमालीचा भेदभाव केला जातो. वर्णव्यवस्था अजूनही इथे आपणास पहावयास मिळेल. अजूनही भुकेने मरणारे लोक दिसतील आणि आपण म्हणतो की आपल्या देशाने प्रगती केली. खऱ्या अर्थाने देशाचे स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही आजही आपल्या समाजात ही विदारक परिस्थिती आपल्याला जबाबदारीचे भान करून देते आहे.
सहज नाही मिळाले आपल्याला हे स्वतंत्र, त्यासाठी रक्ताचे पाट वाहिले आहेत, आणि आज आपल्या हातामध्ये सगळं काही असताना आपण वास्तवाचे भान हरवून आपण आपल्या धुंदीमध्ये आपल्या स्वार्थापायी जगतो आहे. आपल्यामध्ये देशभक्ती फक्त राष्ट्रीय सणा मध्येच का जागृत होते ती दररोज का नसते , स्वातंत्र्य दिवसांमध्ये आपण हातामध्ये मिरवणारा आपला तिरंगा प्लास्टिक्स जागोजागी पडलेल्या दुसऱ्या दिवशी दिसतो तेव्हा आपण आपली जबाबदारी म्हणून तो उचलतो का......?एखाद्या गरीब मुलाच्या हातामध्ये भिकेचा कटोरा असेल तर आपण त्याच्या हातामध्ये वही पेन देतो का......? अशा वृत्तीचे देशभक्त काहीच अपवादाने सापडतात. एखादा अभिनेता वारला तर त्याच्या निधनाचा शोक करणारे सर्व असतात पण एखादा शेतकरी का आत्महत्या करतो? त्यावर बोलणारे मात्र कमी असतात.शेतकरी आपल्या देशाचा पोशिंदा आहे. ज्याच्या भरवशावर आपण आपले आयुष्य चांगले जगतो. त्याच्यासाठी कधीतरी आपल्या तोंडातून काही तरी निघते का...? तो कसा जगतो...? त्याला कुठल्या परिस्थितीमधून जगावे लागते त्याच्या मुलांना उच्च शिक्षण मिळते का ....? जेव्हा त्याचे पीक बाजारामध्ये येते तेव्हा त्यांना मेहनतीने रक्तघामाने पिकवलेले पिक सगळ्यांना स्वस्त हव असत. त्याच्या पिकाला बाजार भाव लागतो का......? त्या पिकावर त्याची कितीतरी स्वप्न असतात ते सगळे पूर्ण होतात का....? आणि कसा बरा आपला शेतकरी आत्महत्या करतो यावर कुणी बोलताना दिसत नाही.एक देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या माहीत असणे आणि त्या पूर्ण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशाची प्रगती कशी होईल, आपल्या देशातल्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी आपण त्यासाठी लढले पाहिजे हे एका जागरूक नागरिकाचे काम आहे.मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आपल्या सुसंस्कृत देशांमध्ये निर्माण होतो ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ही समस्या कमी करण्यासाठी पावले उचलून प्रत्येक महिलेला सुरक्षा बहाल करणे.तिला सामान समजने. तेव्हाच खऱ्या अर्थाने तिला स्वतंत्र मिळते आहे असा तिला म्हणता येईल.आजचे जबाबदारी हरवलेले युवावर्ग आपले सगळे जबाबदारीचे भान विसरून सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे. त्यांना आपल्या जबाबदारीचे भान येऊन आपल्या देशाचा विकास करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे यासाठी त्यांना झोपेतून उठले महत्त्वाच आहे असे मला वाटते..स्वतंत्र दिवस म्हणजे आपल्या महान वीरपुरुषांच्या त्यागाचे, बलिदानाचे स्मरण असते त्या स्मरणाचा विसर न होता आपल्या देशासाठी प्रगतीसाठी सदैव तत्पर राहणे महत्त्वाचे आहे.
सर्व तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला एखादा मुद्दा,विषय प्रश्न, अन्याय कारक वाटत असेल तो देशाच्या अहिताचा असेल तर त्यावर तुम्ही चर्चा करा, बोला, आवाज उचला देश व समाज तुमच्या मागे आहे.पण केव्हा जेव्हा तुम्ही त्यावर बोलाल तो प्रश्न सोडवला आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या देशाचा प्रगतीचा मार्ग आणखी मोकळा होईल,समाजात समानता प्रस्थापित होईल, समाजामध्ये एकता प्रस्थापित होईल, देशात अजुनही जातीवरुन भेदभाव होतो तो संपवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा संपूर्ण देशातील गरिबी निर्मूलन होईल, प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळेल,खर्या अर्थाने स्त्रीची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होईल, अंधश्रद्धा कमी होईल,खेड्यांनाचा विकास होवुन गावे समृद्धीने नांदतील,जगचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करणारं नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास झाला असे म्हणता येईल. तेव्हा उठा आणि आपल्या देशाच्या विकासासाठी कार्य करा ही आपली जबाबदारी आहे. आपल्या देशासाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी, आपल्या पावले उचलावी लागतील.
✍अॅड. विशाखा समाधान बोरकर
(कृपया लेख नावासहितच शेयर करावा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा