शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

पुन्हा नव्याने जगुया आयुष्य.........


काही काळ कोरोणामुळे अचानकच बंद झालेल्या आयुष्यात पुन्हा नव्याने बाहेर जावेसे वाटते,
भन्नाट नेहमीसारखी शॉपिंग करावीशी वाटते.... आपल्या घराच्या परिसरात निवांतपणे फिरावस वाटतं.... कालपर्यंत या पायाला दम नसायचा;पण आज पाय अचानक घराच्या चार कोपऱ्यात बंदिस्त होऊन गेले . मनाच्या डोहात अलगत उठणाऱ्या भावनांना वाटव की पुन्हा उडत जाव या मंदमंद वाऱ्याबरोबर, अन् बेभान होऊन जावं या निसर्गाच्या सानिध्यात. पक्ष्यांच्या थव्यात उडत जावं..... फुलांच्या रंगात स्वतःला हरवून जावं..... निसर्गाच्या झुळझुळ वाहणाऱ्या झर्यामध्ये स्वतःला विसरून जावं. जणु हेवा वाटावा या पाखरांचा, आपल्यापेक्षा आज या विहंगाला जास्त स्वातंत्र्य आहे. किती निर्भीडपणे ते उडतात आकाशी. ना कुठले बंधने ती माणसाने निर्माण केलेली. नाही ते विषारी प्रदूषित हवा. या झाडावरून त्या झाडावर उडतांना या पाखरांना तितकाच आनंद होत असेल आणि त्यांना आनंदी पाहून त्या झाडांना ही खुप आनंद होत असेल कारण या सगळ्या गर्दीमध्ये आज झाडेही वाचलेली आहेत माणसाच्या वृक्षतोडीपासून.किती बरं हे विचित्र आश्चर्य आहे ना कालपर्यंत मुक्याजीवाची तोंड बांधणारा माणूस आज स्वतःच्या तोंडावर मास्क बांधुन फिरतो आहे.प्रत्येकाला त्याच्या केलेल्या कर्माची शिक्षा भोगावी लागते जणू निसर्गाने ही माणसाला दिलेली शिक्षाच आहे असं मनाला अलगत वाटून जाव. आज पुन्हा नव्या तन्मयतेने ते निरागस हरवलेल आयुष्य प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य शोधतो आहे.... रस्ते शांत झाली, पण वने मात्र बोलती झाली आहे त्या पाखरांच्या किलबिल किलबिल आवाजाने, माणसांची गर्दी येतास दूर पळणार्‍या खारुताई आज रस्त्यावर आनंदाने खेळताना दिसतात.
सकाळचे वेळी बाहेर पडले की आज आठवतो आहे तो पारिजातकाच्या फुलांचा सडा,त्याचा सुगंध घेऊन वाहणारा वारा, आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये रस्त्याने चालता चालता मन प्रसन्न करून जायचा. रस्त्यावरची गर्दी माणसाची, ती सर्वांना झालेली धावपळ, प्रत्येक जन आपल्या धुंदीमध्ये जगणारे माणसे, शाळकरी मुलांची धावपळ,ही मुले जणू सुट्टिची वाट पहायाचे. पण आज कित्येक दिवस झाले शाळा चालू झाल्यावर शाळेची घंटा वाजली नाही ,मनाला वाटणारी ती ओढ नेहमीच याने खालीपण वाटत आहे. आज लहान मुलांची दप्तराचे ओझे नसून हातामध्ये मोबाईल असून ऑनलाईन क्लासेस पाहण्यात मग्न झाले किती कंटाळा आलाय नाही का.....?नेहमीच निमित्त शोधून शाळेला दांडी मारणाऱ्या मुलांनाही आता शाळेमध्ये पळत सुटत जावसं वाटत आहे आणि आपल्या शाळेच्या मोकळ्या मैदानामध्ये बेधुंदपणे खेळावेसे वाटत आहे. वर्गामध्ये शिक्षकांनी शिकताना एखादेवेळी गृहपाठ केला नाही तर ती आता शिक्षाही आपलीशी वाटत आहे. ग्रामीण भागातील मुलांना मात्र या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे, कारण महागडे फोन घेऊन ऑनलाइन क्लासेस करणे गरिबांच्या हातच्या बाहेरची बाब असते. त्यामुळे याची पण शोकांतिकाच म्हणावी लागेल .आज आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण आपले बिझी आयुष्य शोधतो आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले, नाना प्रकारचे प्रश्न उभे झालेले आहेत; पण या सगळ्यांना तोंड देत सामोरे जावे लागत आहे हे सगळं काही माणसाला एक नवा अध्याय शिकून गेला. पण हे सर्व असताना. काल पर्यंत रोजच्या भाकरीसाठी रस्त्याने धावत पळत सर्वांना जाव लागायच त्यांना कधी वेळ मिळाला नाही आपल्या लोकांसाठी; पण या सर्व काळामध्ये आपल्या कुटुंबियांना वेळ मिळू शकला ही मात्र एक सकारात्मकता आपण नक्की बघावी. बर्याच महिन्यापासून सतत घरात असताना आज घरामध्ये कुणालाच रहावसं वाटत नाहीये; सगळ्यांनाच बाहेर जाऊन मोकळा श्वास घ्यावासा वाटतो आहे.काळ थांबत नाही तर सतत बदलत असतो, त्यामुळे आज आपण इतक्या दिवसानंतर काहीतरी नवीन नव्याने शिकला पाहिजे. आयुष्यामध्ये घराच्या बाहेर पडताना आता या सुंदर असा निसर्गाला असं जतन करून आपण त्याच्या मध्ये आणखीन भर टाकूया आपण माणूस म्हणून जगत आहोत पण जगताना इतर प्राणी सृष्टीला पण आनंदाने जगू द्यावं.
या संपूर्ण काळामध्ये माणसाच अचानक बंद झालेलं आयुष्य नंतर बाहेर पडताना जणु माणसाला पुन्हा नव्याने जन्म झाला असता वाटव. या अचानक झालेल्या गोष्टी माणसाला सहन करणं आणि त्यामध्ये जगणे ही खरोखर एक मोठी कसोटी असते आणि ही माणसाने पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडली आणि पाडतो आहे त्यामुळे सकारात्मकता ठेवून पुन्हा नव्याने जगण्याचे अंतरीचे कवळसे आपण जपूया.तेव्हा उघडा बंद मनाची द्वारे आणि येऊ दया प्रकाशाची किरणे......वार्‍याच्या मंद मंद झुळूकीवर पुन्हा स्वार होऊ द्या स्वप्नांना.....आयुष्याची कोवळी किरणे अलगदच प्रकाशमय करून जातील जग, अन् प्रसन्न होऊन जाईल प्रत्येक मन.तेव्हा जगुया पुन्हा नव्याने आयुष्य......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा