सोमवार, १३ जून, २०२२

विकास हा सामान्य माणसांसाठी आभासी शब्द!



धगधगणारे रोजचे प्रश्न!
माणसांची प्रचंड गर्दी आणि गर्दीत हरवलेला अस्वस्त माणूस...!
सकाळी उठल्यावर जेवायला काय बनवायचं या प्रश्नाने लगबगीने कामावर गेलेली आई...
पोटात अन्नाचा कण नसतांना पहाटे पहाटे खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जंगलात रान वाटेने निघून गेलेला  बाप..
उकिरड्यावर पडलेला घाण कचरा आणि त्यात अन्न शोधणारी म्हातारी आजी, अंगावरचे फाटलेले कपडे, डोळ्यात आसवे आणि चेहर्‍यावर अनंत काळाची दुःख..!
काही चिमुकले  गाडीवर शाळेत जातात तर काही चिमुकले आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी हात पसरवतात..
उंबरठ्याबाहेर बाहेर पडायचे, पण सुरक्षेचा प्रश्न तिच्या अस्तित्वावर प्रश्न उचलतो, मनामध्ये धास्ती धरतो.
रोजचा मोठा रस्ता
प्रत्येकाचे आयुष्य,प्रत्येकाला दिसणार हेच वास्तव आहे.
कुठे भुकेची भयंकर आग आहे, कुठे भरपूर जेवण असून त्याची किंमत नाही..
हातामध्ये डिग्री, पण बेरोजगारीने हाताश तरुण इकडे  तिकडे फिरतो आहे व्यसनाच्या अधीन होऊन.
मुख्य प्रश्नांचा विचार सोडून दुसर्‍याच विषयावर बोलणे चालू आहे.
कोणत्याही धार्मिक स्थळाच्या वादापेक्षा ग्रंथालयाची जास्त गरज आहे.
कारण पुस्तक शिकवतात सर्वधर्म समभाव, ती शिकवत नाहीत कुठला भेदभावाचा धर्म.
विटा, दगड,माती, रेती या  गोष्टी ने बनवलेल्या वास्तूंवर आपण विश्वास जास्त ठेवतो; पण माणसाला माणसाच्या रक्ताच्या नात्यापेक्षा या वास्तूंच महत्त्व जास्त झालं!
दंगलीमध्ये अडकणारे नेहमी गरिबांची मुले असतात, अल्प शिक्षणामुळे आपल्या बुद्धीचा वापर करू शकत नाही आणि सहजरित्या यांना कोणत्याही कारणाने भडकवण  शक्य असतं, त्यामुळे कसातरी रोजगार मिळून पोटभर भाकर खाणारी ही मुलं नको नको त्या वादात नको त्या मार्गात लागतात. 

आज देशामध्ये पेटलेला भयंकर धार्मिक वाद हा आपल्या उद्याच्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.
इथे कितीतरी प्रश्न आ वासून उभे असतांना केवळ माणसाने माणसाच्या विरुद्ध धार्मिकतेचा विषय करून उभे राहणे हे कोणत्याही एक भारतासारख्या संवेदनशील मानवतेचा पुजारी असलेल्या देशातील जनतेला शोभणारी बाब नाही.
राजकारण करायचे, मुद्दे मांडायचे,वाद घालायचा तर मानवाला आवश्यक असणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा,  शिक्षण,आरोग्य या मुद्द्यांवर चर्चा करा. यावर राजकारण करा, बेरोजगारी सारख्या प्रश्नांवर राजकारण करा, तर ज्या गोष्टी देशाच्या बाधक आहेत, त्या गोष्टीच्या देशाच्या शांततेच्या बाधक आहे, त्या गोष्टीवर राजकारण करून कोणाचे भल होणार आहे? हा देखील साधा प्रश्न कळू नये याचे नवलच नव्हे का?
            खरे वास्तव तर हे आहे विकास हा केवळ आभासी शब्द झाला येथील व्यवस्थेचा. मुख्य प्रश्नांवर चर्चा होऊन या आभासी शब्दाची व्याख्या वास्तवामध्ये खऱ्या अर्थाने उतरावी इतकीच अपेक्षा एका सामान्य माणसाची असते. पण सामान्य माणूस  सामान्यच रहातो आहे शेवटपर्यंत दुर्लक्षित घटक म्हणून. तेव्हा आपण सामान्य ही स्वस्त भूमिका घेऊन बसण्यापेक्षा आपण आपल्या हक्कासाठी कृतीमध्ये लढू ही परिस्थिती बदलण्यासाठी एकत्र येणे महत्वाचे अन्यथा येणारी परिस्थिती याहीपेक्षा वेगळी असेल. आजच्या देशातील परिस्थितीचे भान  गांभीर्याने लक्षात घेता पावले उचलून दिशा शोधणे महत्त्वाचे आहे.
✍अँड.विशाखा समाधान बोरकर
रा. पातुर जि. अकोला