बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

येथील व्यवस्थेला आता तु पण बळी ठरलीस...

#हाथरस
#Hathras
येथील व्यवस्थेला आता तु पण बळी ठरलीस ....
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
येथील व्यवस्थेला आता तू पण बळी.. किती वेदनेने तळमळत असेल त्या आई वडिलांचं मन !काही दिवसांपूर्वीच डोळ्यांसमोर हसत खेळत असणारी त्यांची मुलगी आज नकळत वेदनेच्या आक्रोशात त्यांच्यापासून दूर गेली, कधीच न परतण्यासाठी...
तिच्यावर अत्याचार होऊन इतके दिवस होऊनही न्याय देणारे हात कमी उठले आणि त्या अन्यायाला दाबणारे हात जास्त मिळाले. आधी ही अफवा आहे म्हणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढणारे अत्याचार हे काही केल्या कमी होत नाही आहेत.त्याचे एक उदाहरण कारण ती जर दलित मुलगी नसती आणि श्रीमंत घरातील असती तर ही गोष्ट वाऱ्यासारखी जिकडेतिकडे पसरली असती. जेव्हा हे अत्याचाराचे प्रकरण घडलं तेव्हा आमचा मिडिया बॉलीवूडमध्ये चालेल्या अनावश्यक गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करून होता. नेमकं हेच नेहमी होतं आणि या वेळीसुद्धा हेच झाले. कुठल्या दलितांवर झालेला अत्याचार असो किंवा कुठल्या गरिब स्त्रीवर झालेला अत्याचार असो,तो आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिक केला जातो, त्यातील हाथरस हे प्रकरण सुद्धा सुरुवातीला दाबण्याचे प्रयत्न झाले.आजही मोठ्या प्रमाणात ही प्रकरणे दाबली जातात त्यातील काहीच मुलींना न्याय मिळतो बाकी याच व्यवस्थेला बळी पडून अन्यायाच्या आक्रोशामध्ये शेवटचा श्वास घेतात. देशातील समाज व्यवस्था मानसिकदृष्ट्या आजही स्त्रियाप्रती बदललेली नाही. दिवसेंदिवस त्यांच्यावर होणारे अत्याचार हे वाढतच चालले आहेत.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 14 सप्टेंबर 2020 ला गावातील 4 लोकांनी 19 वर्षीय मागासवर्गीय मुलीवर सामूहिक बलात्कार व मारहाण केली त्यामुळे तिचा दिनांक 29 सप्टेंबर 2020 ला दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पीडित मुलगी आई सोबत शेतात गेली असता तिला आरोपींनी शेतातून उचलून नेले व जातीयवाद्यांनी अत्याचार केला. प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत.अत्याचाराला बळी ठरलेल्या पीडित मुलीच्याआई-वडिलांवर ती गेल्यामुळे दु:खाचा पहाड पडला अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही आई-वडिलांना दिला जात नाही ही कुठली व्यवस्था आहे...? आणखीन किती दिवस हे अत्याचाराचे सत्र चालू राहणार...? आणखी किती मुली बळी ठरतील...?आम्ही निमूटपणे पाहण्याचे काम करणार का...?कधी बदलणार येथील समाजातील मानसिकता...? काही दिवसापूर्वीच खैरलांजी प्रकरणाला २९ सप्टेंबर २०२० रोजी १४ वर्षे पूर्ण झाली.हा मनावर केलेला आघात सावरता सावरत नाही तर, पुन्हा या तरुण मुलीवर अत्याचार होऊन तिला आपला जीव गमवावा लागला.ती बोलू शकू नये, म्हणून तिची जीभ कापण्यात आली आणि तिला चालता येऊ नये म्हणून तिची हाडे तोडण्यात आली.आज हाथरस येथिल पीडिता अत्याचाराशी लढता-लढता या जगातून निघून गेली. पण तिच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे. त्या चार नराधमाला फाशी झालीच पाहिजे.पीडितेचा आवाज होऊन आज प्रत्येक भारतीयांनी आवाज उचलून हाथरस येथिल पीडिते सारख्या आणखी कुणाचा बळी न जाण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. पीडितेवर झालेल्या अत्याचारासाठी या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तेव्हा कुठे समाजातील असे कृत्य करून आणखी कुठल्या निष्पाप मुलीचा जीव घेण्यासाठी कोणताच हात उचलण्याचे धाडस होणार नाही.
येथे रोज घडते हाथसर 
काहींना मिळतो न्याय
काहींचा होतो विसर 
गुन्हाच ठरतो येथे
ती स्त्री असण्याचा 
ती आक्रोश करते एकटी 
आम्ही मात्र बेफिकर 
तिची जात कोणती आहे
ठरवू नका आता तरी 
कारण तुमची ही मुलगी चालत असते
रस्त्याने एकटीच भरभर 
कित्येक दाबली प्रकरणे अशी 
कित्येक हरवल्या पीडिता 
द्या सुरक्षा आणि द्या बळ लढण्याचे 
समाजकंटक जगतील आनंदाने
आणि पीडिता हरवत राहतील नाहीतर.

#हाथरस
#Hathras
©️अॅड.विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला 
01/10/2020
********************************************
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

तुला खरा बुद्ध कळणार आहे....



तुझ्या क्रूरतेचा कळसच मानवा
इतका चढतो आहे
जीव घेऊनी कोणाचा
तो महल बांधतो आहे
तुझ्या हृदयातील सांग
गेली कुठे ती मानवता
अहिंसेचा बुद्ध तुला
कधी कळणार आहे .........?

नश्वर इथले विश्व हे सारे
मृगजळामागे तु धावतो आहे
जरी श्रीमंत त्या वैभवाचा
समाधान कुठे तुझ्या मनात आहे.....?
घालता अलंकार मोत्या सोन्याचे
का अहंकारते मन तुझे......?
त्या सोन्याच्या वैभवाला त्यागणारा
सिद्धार्थ तुला कधी कळणार आहे......?

का अधिराज्य गाजवायचे लोकावर
कधी मनावर राज्य करू पहा
कळेल तुला मोल मनाचे
शिंपल्यातील मोत्यापेक्षा जास्त आहे
दिसता रोगी तुला रे किडस
गरीबही तुला वाटते तुच्छ
त्या रोग्यांची सेवा करणारा
बुद्ध तुला कधी कळणार आहे......?

बुद्ध म्हणजे जात धर्म नव्हे
ना कुठला चमत्कार आहे
तो माणूस म्हणून जगण्याचा
एक जीवन मार्ग आहे
तू वाच एकदा अष्टांगिक मार्ग
येईल जाग तुला
ते आत्मसात केल्याशिवाय तुला
कसा बुद्ध कळणार आहे.....?

तो वैभवाचा महल
तो अमृताचा घास
तुला तुझाच राहू दे
कधी भाकरीच्या स्वरूपात जा
त्यावर रस्त्यावरच्या भिकाऱ्या जवळ
त्याच्या भुकेची केलेली शांत तृष्णा
त्याचे एक स्मित हास्य
सर्वात अनमोल भेट आहे
तुला बुद्ध समजून घेण्यासाठी
नाही करावा लागेल त्याग कुठला
प्रज्ञा शील करुणा
बुद्धाचा सोपा सरळ मार्ग आहे

जेव्हा मनात तुझ्या
येईल वादळ
हृदयी काहूर अशांत आहे
त्या वादळातून वाचवणारा
एकमेव बुद्ध मार्ग आहे
तू बनवलेले अणूचे शस्त्रे
फार विघातक नाहीत रे
तुझ्या शब्दाच्या धावा पेक्षा
तू जाणून घे ती सम्यक वाणी
तुला खरा बुद्ध कळणार आहे

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

विस्तवाचा निखारा


का आयुष्यी त्याच्या
विस्तवाच निखारा
रक्ताघामाने भिजते धरणी
पदरी नापिकीचा पसारा
रात दिस डोळे त्याचे
पिकाकडे बघती
राखता पिक अनवाणी
पाया माय मातीचा सहारा


कधी फाटक्या वहनातून
फन लागे पायाला
भळभळ रक्त वाहे
नयनी आसवांच्या धारा
ते आभाळाचं लेकरू
झोक्यामध्ये रडत राही
माय वेचता फन वावरातले
लेकरा देई पहारा

उभ्या वावरात त्याच्या
रक्ताघामाच शिंपण
लेकरावाणी जपतो पिक
उनवार झेलत सारा
जपण्या पिक रात्रीला तो
जागल जाई रानी
पहाटी पहाटी डोईवर त्याच्या
इंधनाचा भारा


दिसा माग दिस जाती
घरी येई पिक
स्वागत होई पिकाचे
मनी स्वप्नांचा पसारा
लेकरा बाळा कपडेलत्ते
वही-पेन घेईन
जाताना बाजारी क्षणात
होई स्वप्नांचा चुराडा

मातीमोल भाव लागे
ढसाढसा तो रडतो
बाहेर कर्जाचा डोंगर
मन घेईल फाशी चा सहारा
पिकाचे मोती माती मोल देऊन
घरी रडत रडत येई
स्वप्नांना नाही अर्थ
आयुष्या जणू विस्तवाचा निखारा

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

खेड्यातील मुल म्हणजे मातीतील मोती........



थोडे उनाड वाटणारे........., आपल्याच तंद्रीत आनंदाने जगणारे....... कसलाच भय त्यांच्या हृदयात नसणारे ही आमची गावाकडची मुल, असतो केवळ चेहऱ्यावर आनंद आणि घ्यायचं असतं क्षितिजाला कवेत एवढे धाडस मनगटामध्ये असतं.पायाला लागलेल्या मातीचा त्यांना विट्टाळ वाटत नाही,मातीला अंगाखांद्यावर घेणारे, त्यावर खेळणारे, आयुष्य जगणारे, ते मातीतील मोती असतात. त्यांच्यासाठी ती माती नसतेच कधीही! त्यांच्यासाठी त्यांची ती आई असते, आपली मातृभूमी जिच्यावर ते जीवापार प्रेम करतात. सौंदर्यप्रसाधने वापरून त्यांना आपलं सौंदर्य फुलवायचं नसतं, ते तर सूर्याच्या प्रकाशात आणखीन प्रकाशणारे सूर्याची मुलच असतात! नाले, ओढे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन आपल्याच आनंदात जगणारे निसर्गाचे मित्रच ते ,त्यांचे ते एक अतूट नातं. त्यांना देखाव्याच्या वैभवामध्ये कसलं मन रमत नाही. त्यांना त्यांची झोपडी व त्याच्यात खाल्लेली अर्धी भाकर त्यातच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी झळकत असत. नाही जमत त्यांना ती स्टॅंडर्ड इंग्लिश बोली; पण त्यांच्या त्या आपल्या बोलीभाषेमध्ये जिव्हाळ्याची आपुलकी असते. ही उनाड वाटणारी मातीतील मोती मात्र मातीच का राहून जातात .......??????त्यांच्या स्वप्नांना का पूर्ण होण्याआधी कुस्करल जातं.......????शिक्षणाच्या वयात हातात खुर्पे घ्यावे लागते याला जबाबदार कोण????गरिबीला लढत मोठे होणारे खुप अधिकारी आहेत;पण शिक्षणातुन मन गेल्यावर पुन्हा हाती पुस्तक घेणारे हात जबादारीणे पार खचून जातात,कधी गणिताची भिती,कधी ती नकोशी वाटणारी इंग्रजी,जिचा a फोर apple इतकीच पुढे आमच्या मुलांची गाडी पोहचलेली असते.आणि ती पुन्हा त्यांना कधीच पुढे जाऊ देतच नाही.कधी पेन -पेन्सिल ,वह्या- पुस्तक याला पैसे नसतात,तर कधी बाहेर गावाला शिक्षणासाठी पैसे नसतात,कितितरी प्रश्ने आहेत या निरागस मुलांची,जी अजुनही सुटता सुटत नाही.पुढे अल्पभुधारक शेतकरी जगणे समोर असते,तर तेही नसले तर रोजीरोटीसाठी मजुर होवुन जाते ते उद्याचे भविष्य! जर ही मूल चांगल्या श्रीमंत घरी जन्माला आले असते तर हा प्रश्न कधीच आला नसता.
पाचवीला पुजलेलं त्यांच दारिद्र हे त्यांच्या अपयशाचे कारणे होत तर नाहीत; पण त्यांच्या यशाच्या मार्गाच्या आड येणारे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जे मुलं आपल्या आई-वडिलांना लहानपणापासून निसर्गाच्या केलेल्या प्रत्येक घावावर प्रत्यक्षपणे तोंड देऊन जिंकायच पाहतात.ज्या मुलांना प्रत्येक संघर्षाला तोंड देऊन जगण्याचं बळ मिळतं, ते मुल अचानकपणे शिक्षणाच्या बाबतीत का मागे राहतात.......????? ती होतकरू हुशार असून त्यांना परिस्थितीनुसार जगून जबाबदारी मध्ये अडकून आपल्या शिक्षणाच्या पेनाच्या जागी नांगर वखरंच का हाती धरावा लागतो.........?????? कुठे मोठे शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही यांच्याकडे नोकरी लागण्यासाठी पैसे नसतात मग सुशिक्षित बेरोजगारीचा ठप्पा माथी लावुन आयुष्य जगावं लागतं. हे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ग्रामीण भागातील मुलांची आहे. या स्पर्धेच्या काळामध्ये शंभर जागेसाठी हजारोनी फॉर्म जमा होतात. त्यापैकी शंभर निवडतात बाकीच्यांचे काय होते हे त्यांनाच माहिती. जर का या मातीतील हिऱ्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणारे शिक्षण उपलब्ध करून दिले किंवा त्यांच्या चांगल्या गुणांचा वापर व्यावसायिक या उपक्रमांमध्ये जर केला तर त्यांचा विकास होऊ शकतो.का ग्रामीण भागातील मुलांना, माणसांना छोट्या-छोट्या मजुरीवर शहरी भागामध्ये व्यवसायासाठी पडावे लागते ?जर का या व्यवसायाच्या गोष्टी आपल्या गावात मध्ये निर्माण झाल्या तर त्यांना तिथे जाऊन आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागणार नाही. रानमळयात वाढणारी ही निसर्गाची मूल,आभाळाच्या मोठ्या संघर्षाला तोंड देण्याचे सामर्थ्य यांच्यामध्ये आहे. मातीतील मोत्यांची किंमत कळायला हवी.दिवसेंदिवस होत जाणार शिक्षणाचे बाजारीकरण जर असच चालत राहिल तर या मुलांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावं हा मोठा प्रश्न. आजचे शिक्षण म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्यामध्ये बाहेरील क्लासेस लावायचे सामर्थ्य आहे, त्यांचंच झाल आणि ही सत्य परिस्थिती आहे. पण ग्रामीण भागातील मुलांची होणारी हालअपेष्टा याचं मात्र कोणाला तीळमात्रही फरक पडत नाही. उलट त्यांच्या बोलीभाषेतून, कपड्यालत्त्यातून राहणीमानातून त्यांना हिणवलं जातं.यातील काहीच मोजकेच मुलं आपल्या आयुष्यात चांगल्या रीतीने जगू शकतात आणि चांगल्या रीतीने मोठ्या पोस्टवर अधिकारी बनू शकतात; पण बाकीच्यांचे काय हा प्रश्न तोपर्यंत सुटणार नाही ;जोपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न योग्यरित्या सोडवल्या जात नाही, कारण शिक्षणाचे होणारे बाजारीकरण आणि शिक्षण दरबारामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळातल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत. आयुष्याच्या येणाऱ्या नवीन नवीन वळणावर मग यांच्या हातातून वही पुस्तक दूर होऊन जबाबदारीचे ओझे पाठीवर येते.ग्रामीण भागातील हे प्रामुख्याने मजुरांची आणि शेतकऱ्यांची असतात त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आपोआपच येते. नंतर काही दिवसातच त्या मातीतील मोत्यांची माती घेऊन जाते. त्यामुळे या मोत्यांची किंमत झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

तेच खरं आयुष्याचं नाव असतं




ब्रँडेड ज्वेलरी, ब्रँडेड कपडे
म्हणजेच आयुष्य नसतं
त्या झोपडीतील भाकरीत
सुख लपलेलं असतं

नको भडिमार त्या सुखाचा
नको तो कागदाचा पैसा
दु:ख वाटून घेण्यासाठी कोणी
जवळ असावं लागत असतं

ती उडणारी पाखरे ,अंगणातील फुले
क्षितिजापल्याडच त्यांच जगणे असत
नाही ती स्पर्धा कुठल्या लोभाची
नव्या उमेदीचे पंखात बळ असतं

आपणच माणसे बिघडलोय सारी
म्रुगजळाच्या मागे आपलं धावण असतं
वैभवाचे वारे आणि प्रशस्त बंगला
यातच आमचं सुख लपलेलं असतं

सुखाच्या व्याख्येने आभासी जग व्यापलं
पाषाणाचे हृदय म्हणजे ह्रदय नसतं
प्रत्येकाच्या सुखाचा विचार मनी यावा
तेच खरं आयुष्याचं नाव असतं

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

पोरके आज मी बाबा


हरवल्या दाही दिशा त्या
 हरवला तो सहारा 
बंद झाली दारे अचानक 
पाखरू सोडून गेला पिंजरा

 आर्त मनाचा आता
 कंठ दाटून येतो
 आलं वादळ जीवनी
 हरवला मी तो किनारा 

 नजर वादळात त्या
 शोधून पाहे बाबांना 
दिसेल का पुन्हा मला
  ती हरवलेली हास्य मुद्रा

 स्मित हरवले मी
 त्या काळाच्या वादळात
पोरके आज मी बाबा
 नयनी आसवाचा धारा