शनिवार, १५ जानेवारी, २०२२

या पिढीला नावे ठेवण्याआधी......



अलीकडे आजच्या युवा पिढीला नावे ठेवण्याचा फारच मोठा सुर आहे. जो तो या पिढीला नाव ठेवत बसतो.आजच्या पिढीला वास्तवाचे भान नाही , आजचे मुल मोबाइलवर गुंतलेले आहेत,वैगेरे वैगेरे... वास्तविक पाहता हे सगळे प्रश्न जरी खरे असले तरी या पिढीला ज्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे त्या गोष्टीचा विचारही करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे विस्कटलेली शैक्षणिक परिस्थिति,ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक नुकसान झालेले विद्यार्थी ह्या सर्व परिस्थीतीला विद्यार्थ्यांना कश्या प्रकारे तोंड द्यावे लागते आहे याची कोणी कल्पना देखील करु शकत नाही .सद्याची निर्माण झालेली परिस्थिती ही एकाच वेळी निर्माण झालेली नाही.ज्या प्रमाणे या मुलांना दोष देण्यात येतो त्याला जबाबदार कुठेतरी तुम्ही सुद्धा आहात. देशामध्ये शिक्षणाचे करून ठेवलेल बाजारीकरण होतकरू हुशार; पण परिस्थीतीने गरिब या शापामूळे मुलांच्या आयुष्याचे बारा वाजत आहे. एकिकडे सरकार शिष्यवृत्ती तर देते, पण ती शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नाहक त्रास ही तितकाच देण्यात येतो. वेळेवर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात कामी पडेल असेही नाही. ती शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा वेळा चकरा माराव्या लागतात ही असणारी परिस्थिती आहे. गरीब-श्रीमंत, जातीभेद, धर्मभेद, वंशभेद, लिंगभेद, वर्णभेद, प्रांतभेद,ही जेवढी मानवतेच्या आड येणारे भेदभाव आहे ते आजच्या पिढीने तर निर्माण केलीली नाहीस ना? ही भेदभावची भेट तर कितीतरी युगापासून चालू आहेत, एका पिढीकडुन दुसर्या पिढीला वारसा देत जावा असाच हा भेदभावचा वारसा सुरु आहे हे येथिल वास्तव आणि हेच येथिल काही धर्माचे रुढी परंपरेचे ठेकेदार आजच्या युवा पिढीच्या मनात वैचारिक धार्मिकतेचे विष पसरवून पुढे ठेवत आहेत याला दोषी वा गुन्हेगार कोण आहे? शाळा शिक्षणाच्या वयामध्ये घराच्या जबाबदारिचे भार डोक्यावर तर एकिकडे शिक्षणाची स्वप्न खुणावत असतात.डोळ्यात उद्याच्या भविष्याची स्वप्न मनात असतात हे सर्व असताना शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर कितीही उंचावले तर त्या गुणवत्तेला योग्य न्याय दिल्या जात नाही.आपल्या ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी व गणित ही दोन विषय अजूनही जीवघेणी ठरतात.तेवढ्या दोन विषयाच्या भीतीमुळे आमची मुलं शाळेत जाण्याचे टाळतात. मराठी मुलांना इंग्रजी का येत नाही हा एक संशोधनाचाच मुद्दा आहे. जर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून खरे विद्यार्थी घडवण्यासाठी परिश्रम घेतले तर ग्रामीण भागातील मुलांना ह्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येत नाही.शहरी भागामध्ये उच्चशिक्षणासाठी गेलेल्या मुलांना आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी तडजोडी करून आपले शिक्षण पूर्ण करावे लागते. पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी कितीतरी प्रश्नांना सामोरे जावे लागते. उपाशीतापाशी दिवस काढावे लागतात तेव्हा जाऊन खूप मेहनतीनंतर ती नोकरी त्यांना मिळते.आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये तीनशे जागांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात येतात यावरून आपल्याला अंदाज येईल की आपल्या देशामध्ये किती मोठी बेरोजगारी आहे. आजच्या युवा पिढीने बेरोजगारीने इतके पोखरले की शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी चार पाच वर्षे लागतात. घरी शिक्षणासाठी लावलेला पैसा विद्यार्थ्यांना दिसतो. त्यामुळे त्यांना नैराश्याला सामोरे जावे लागले.बेरोजगारी मधून कितीतरी युवक आज आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत.आज आपल्या देशामध्ये ज्या डोके भडकणार्या सगळ्या विषारी गोष्टीचा पसरवण्यात येत आहेत त्या ऐवजी या प्रश्नांवर जर बोलले गेले तर खरंच आजच्या युवा पिढीला कुठेतरी सांभाळून पुन्हा नव्याने उभे राहण्याच बळ प्राप्त होईल.आजच्या युवा पिढीच्या हातामध्ये जातीभेदाच्या मशाली देण्यापेक्षा मानवतेच्या क्रांतीच्या मशाली देवून एक सामाजिक समानतेवर आधारित समाज निर्माण करने गरजेचे आहे.धार्मिक वंशपरंपरेचा अभिमान बाळगण्यापेक्षा मानवता या गोष्टीचा अभिमान बाळगून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि या प्रयत्नामधूनच एक सशक्त समाज युवकांना घडवू शकतो.मोबाईलचा वाईट वापर करणार्‍या मुलांमध्ये चांगल्या मुलाची तुलना होऊ नये असे वाटते,कारण आज मोठ्या महागड्या ट्युशन न लावू शकणार्या मुलांसाठी युटुबवर असलेली लेक्चर होतकरू मुलांचे जीवन घडवणारी मोठी संधी आहे. त्यावर ही मुले ऑनलाइन शिक्षण घेऊन आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत.परिस्थितीला बदलू पाहत आहे.इथे इतकेच म्हणणे आहे कि, ज्या गोष्टी आज समाजामध्ये निर्माण केलेले आहेत हे येथील वीस- पंचवीस वर्षाच्या मुलांनी निर्माण केलेल्या नाहीयेत. हे यांच्या आधी पासून निर्माण झालेल्या आहेत, तर हा तुम्ही केलेल्या चुका या मुलांच्या माथी न लावता त्या त्यांच्या हातून पुढे न घडण्यासाठी प्रयत्नशील तुम्ही सर्वांनी असले पाहिजे. हे तुमचे सुद्धा तितकेच सामाजिक कर्तव्य आहे.आज मुठभर सुखवस्तू घरातील भटकलेल्या मुलांच्या आयुष्यावर बोलण्यापेक्षा जे होतकरू गरीब ,ग्रामीण भागातील शेतकरी ,मजुरवर्ग यांची मुलं आहेत त्यांना दिशा मिळणे महत्त्वाचे आहे यावर बोलणे मह्त्वाचे आहे. त्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे,कारण येथील सामाजिक राजकीय व्यवस्था यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचे नुकसान देखील करते आहे. बोलण्यासारखे लिहिण्यासारखे अनेक मुद्दे आहेत यावर बोलले जाते, पण या मुलांची परिस्थिती होती तेच आहे.शेवटी या पिढीला नाव ठेवण्याआधी या पिढीला सामोरे जाण्यात येणार्‍या प्रश्नांना सोडवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे सामाजिक प्रश्न आहेत कारण ते कुठल्याही एका मुलाचे प्रश्न नाही तर समाजातील,देशातील कितीतरी मुलं आज त्या प्रश्नांमुळे आपलं आयुष्य गमावत आहेत. त्यामुळे ही प्रश्न अत्यंत महत्त्वाची या प्रश्नांना मार्ग मिळणे महत्त्वाचे आहे असे वाटते.

✍अॅड.विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा