बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

मानवधर्म मोठा आहे....



मी जन्मलो तेव्हा नव्हते माहीत मला जाती धर्माच्या भिंती....
मी फक्त माणूस म्हणून जन्माला आलो होतो......
मी फक्त माणूस होतो
न कुठल्या जातीचा ना  कुठल्या पातीचा न एका समाजाचा.....
पण माझे नाव ठेवले गेले जातीवरून .....
माझा धर्म अस्तित्वात आला ...
मी माणसातुन दूर होऊन जातीच्या बंधनात बांधल्या गेलो ..
मी आता लहानाचा मोठा झालो....
समाजाला पाहू लागलो...
जो तो आपलीच जात श्रेष्ठ घेऊन बसला होता....
माणूसच माणसापासून दूर जात होता......
मी शाळेत गेलो तिथेही मला ही जात दिसली माझ्या टीसी वर लिहिलेली....
शाळेतून जणू ही बालमनावर पेरणी झालेली...
शाळेत केवळ ज्ञानार्थी असावे पण तिथेही ही जात मला दिसली.....
निष्पाप मनावर कोरल्या गेली....
मोठा होत गेलो समाजाच्या या जातीपातीच्या वातावरणात ....
जेव्हा वेळ आली माझ्या जातीच्या संघर्षाची तेव्हा मी पण केली दगडफेक आपल्याच माणसांवर......
दोष कोणाचा आहे माझा की या समाजाचा जो जातीचे बीज अजूनही मुळासकट उखडून टाकत नाही.....
वेळीच का दिशा नको का ह्या समाजातील युवकांना जे ह्याच जातीपातीच्या वातावरणात आयुष्य वाया घालवतात....
की त्यांची डोकी पेटवून दिली जातात...
पुरे झाले हे जगणे जातीपातीचे मी माणूस आहे ...
हीच माझी जात आणि माझी ओळख आहे...
बंद का होत नाही हा रक्तपाताचा संघर्ष .....
थांबवा ही नेहमीची जाळपोळ ...
अन्यथा माणूस हरेल आणि ही जात नावाची बिमारी जिंकेल ..
मी पाहिले, जगलो,मी ही दंगा केला पण आता माझे डोळे उघळले ....
आता मला माणूसच मोठा वाटतो कारण हा आता माझा विचार आहे ....
हाच विचार तुम्ही ही करा कारण अजून खूप पुढे जाणे आहे आपल्याला .....
गरिबिसोबत लढायचे आहे आपल्याला ....
आजही उपाशी पोटी लेकरू रडून मरते गरिबाचे ...
त्यांना दोन घास भाकर देऊन जगवायच आपल्याला.....
 नकोच हा संघर्ष आता फक्त माणूस मोठा माणसातील माणुसकी मोठी आहे .....
मानवधर्म हीच जात खरी म्हणून धावून जाऊ तिथे जिथे गरज आहे....
मिटवू हे बीज विषाचे ...
पाडून टाकू  ह्या भिंती 
 कारण मानवधर्म मोठा आहे....
मानवधर्मच मोठा आहे.... 
                          
          अॅड विशाखा समाधान बोरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा